Andheri bypoll: केंद्रीय निवडणूक आयोग अंधेरी पोटनिवडणूक रद्द करणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ ऑक्टोबर । गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण, ही पोटनिवडणूक लढवत असलेल्या एका अपक्ष उमेदवाराने आपल्यावर अर्ज माघारीसाठी ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिलिंद कांबळे असे या उमेदवाराचे नाव आहे. कांबळे यांनी ठाकरे गटाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती. यामध्ये मिलिंद कांबळे यांनी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आयोग मिलिंद कांबळे यांच्या मागणीची दखल घेऊन अंधेरी पोटनिवडणूक खरंच रद्द करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसे घडल्यास हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो.

अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून अनेक पातळ्यांवर ठाकरे गटाला प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिका मंजूर करत नसल्याने शिवसेना (ठाकरे गट) न्यायालयात गेली होती. न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ऋतुजा लटके यांचा पोटनिवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या सगळ्यानंतर अंधेरी पोटनिवडणूक रद्द झाल्यास ठाकरे गटाची सर्व मेहनत पाण्यात जाईल. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी कांबळे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजप याप्रकरणात उडी घेणार का, हेदेखील पाहावे लागेल.

मिलिंद कांबळे यांचा नेमका आरोप काय?

अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारांवर माघार घेण्यासाठी दबाव आणला जात होता, असा दावा अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर केला आहे. ऋतुजा लटके यांच्यासोबत असलेले सहकारी मला धमकी देत होते. अन्य अपक्ष उमेदवारांवर देखील दबाव टाकून त्यांना देखील निवडणूक प्रक्रियेतून माघार घेण्यास भाग पाडले, त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात यावी, अशी मागणी मिलिंद कांबळे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी जय्यत तयारी

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात येत्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी बुधवारी दिली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून निवडणूक शांततेत आणि निष्पक्षपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *