महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । माझ्या वडिलांना कुणी मारले मला माहिती आहे, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होते? असा सवाल पूनम महाजन यांनी मुंबईचा जागर कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला आहे. तेव्हा तुम्ही सत्तेत होतात असे म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. जर 50 -50 चा फॉर्म्युला ठरला होता तर मुंबईत मनपात उद्धव ठाकरेंनी भाजपला महापौरपद का दिले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
खासदार पूनम महाजन म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारण केले. राज्यात आता मराठी- गुजराती असा वाद निर्माण करताय? तुम्ही हे कदाचित विसरले असाल की गुजरात भाजपचे अध्यक्षदेखील मराठी आहे. गुजरातमध्ये मराठी माणसाने जो झेंडा फडकवला त्याचा अभिमान उद्धव ठाकरेंना नाही का असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला आहे.
युतीमध्ये भांडण झाले, दोन भावांमध्ये महाभारत झाले हे घडवणारे शंकुनी कोण होते, हे सर्वांना माहिती आहे असा टोला पूनम महाजन यांनी लगावला आहे. शंकुनींनी सर्व घडवले आणि स्वत: सत्तेत जाऊन बसले. मी काही बोलले तर माझ्या वडिलांना कुणी मारले असा प्रश्न हे सगळे विचारतील असे पूनम महाजन म्हणाल्या. पण माझ्या बापाला कुणी मारले हे मला माहिती आहे, तो प्रश्न निर्माण करुन काही होणार नाही, पण त्या मागे मास्टरमाइंड कोण होते? हे तुम्ही शोधून दाखवले नाही, असे म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
2014 आणि 2019 ला मी महायुतीमुळे खासदार झाले, यांचा मला अभिमान आहे. मित्रपक्षाला याचा अभिमान का नाही असा सवाल त्यांनी शिवसेनेला केला आहे. जर 50 -50 चा फॉर्म्युला ठरला होता तर मुंबईत मनपात उद्धव ठाकरेंनी भाजपला महापौरपद का दिले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर मुंबईत् महापौर भाजपचा बसला असता तर आज ही वेळ आली नसती असेही यावेळी पूनम महाजन यांनी म्हटले आहे.
मुंबईतील हा जागर अनेक प्रश्न विचारणार आहेच पण न सुटलेल्या मुंबईकरांच्या प्रश्नांचा जाब ही विचारणार आहे , असेही खासदार पुनम महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार अँड पराग अळवणी यांचेही भाषण झाले.