महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ नोव्हेंबर । हर हर महादेव सिनेमावरून आता राजकीय वाद पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी हर हर महादेवचा शो बंद पाडला होता आणि एका प्रेक्षकाला मारहाण केली होती. या प्रकरणी आता 100 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहे.
हरहर महादेव सिनेमामावरून राष्ट्रवादीचे आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड हे आपल्या कार्यकर्त्यांसह आले आणि त्यांनी हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी एका प्रेक्षकालाही मारहाण केली होती. या प्रेक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला.
दरम्यान, विविआना मॉल येथे जितेंद्र आव्हाड यांनी बंद पडलेला चित्रपटात झालेल्या प्रकरणावरून ठाण्यातील वर्तक नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या 100 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहे. 141,143,146,149,323,504, मुंबई पोलीस कायदा कलम 37/135 इत्यादी कलम लावण्यात आले आहेत.
फिर्यादी प्रेक्षक विजय दुर्वे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिनेमा बंद पाडल्यामुळे दुर्वे यांनी तिकीटाचे पैसे मागितले होते. दुर्वे हे मनसेचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला.
काय म्हणाले आव्हाड?
हर हर महादेवचा शो सुरू असताना जितेंद्र आव्हाड अचानक थिएटरमध्ये आले आणि त्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट न बघण्याचं आवाहन केलं. ‘इतिहास बदनाम आणि विकृत करण्याची पुरंदरी परंपरा आहे. ब.म पुरंदरेंनी महाराष्ट्रात सुरू केलं ते आता सिनेसृष्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम सुरू झालं आणि त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला तुमच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण असे विकृत सिनेमे महाराष्ट्रात दाखवायचे नाहीत हे आम्ही जाहिररित्या सांगतो’, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला.