महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ नोव्हेंबर । अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गट किंवा महाविकासआघाडीची भूमिका काय आहे, यापेक्षा राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने अब्दुल सत्तार यांना पदमुक्त केले पाहिजे. हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचे नाव आले होते. राज्यात ओला दुष्काळ असताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) स्वत:च्या मतदारसंघात बांधावरही गेले नाहीत. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्याचा विषय बाजूला ठेवा. पण कुठल्याही महिलेला अशाप्रकारे शिवीगाळ करणे योग्य नाही. अब्दुल सत्तारांच्या मनातील गोष्टी ओठावर आल्या आहेत. हा गलिच्छपणा आहे, असे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटले. ते मंगळवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी आक्रमकपणे अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अब्दुल सत्तार यांना पदमुक्त करणे गरजेचे आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मला अपेक्षा नाही. तसेच याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोग काय कारवाई करणार, हेदेखील पाहावे लागेल. नुसत्याच नोटीस पाठवून फायदा नाही, अब्दुल सत्तार यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्याविरोधात प्रचंड आक्रमक झाले होते. यानंतर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला गेले आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस नक्की काय मागणी करणार, हे बघावे लागेल.
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काही तासांपासून महाराष्ट्रात अक्षरश: रान उठवले होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी नाहक ओढवून घेतलेल्या या वादामुळे शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच नाचक्की झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अब्दुल सत्तार यांच्यावर प्रचंड संतापले होते. मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार यांना फोन करून त्यांचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे.