महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ नोव्हेंबर । टी२० विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा भारतीय संघ शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत छाप पाडण्यासाठी उत्सुक होता मात्र पावसामुळे ही उत्सुकता आणखी पुढे ढकलली गेली आहे. भारतीय संघाने गेल्या दोन वर्षांत टी२० फॉरमॅटमध्ये दोन विश्वचषक खेळले आहेत, पण चुकांमधून धडा घेतलेला नाही. २०२१ साली युएई मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत संघ पहिल्या फेरीतच बाहेर पडला होता. आता ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीत दहा गडी राखून पराभूत होऊन जेतेपद पटकावण्यापासून संघ वंचित राहिला. त्यामुळे २०२४ साली वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या पुढील टी२० विश्वकरंडकाची तयारी या लढतीपासूनच सुरू होणार होती मात्र आता अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेत भारताचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाचा यावेळी कस लागणार हे निश्चित.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिका शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) सुरू झाला. उभय संघांतील हा पहिला सामना वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. हवामान खात्याने सामन्याच्या वेळी पाऊस येईल, असा अंदाज वर्तवला होता, जो अगदी खरा ठरला. पावसामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला.