![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ नोव्हेंबर । प्रतापगड किल्ल्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटवल्यानंतर वन विभागाने पुण्यातील किल्ले सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गडाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहा वाजता सिंहगडाचे पायथ्यापासून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत असलेल्या खादयपदार्थांच्या टपऱ्यांचे अतिक्रमण काढून टाकले आहे. अनधिकृत बांधकाम काढण्याचा निर्णय स्टॉल धारकांशी चर्चा करुन घेण्यात आला.
किल्ले सिंहगडावर गेल्या काही वर्षापासून गडाच्या पार्किंगपासून ते माथ्यापर्यंत खादयपदार्थ स्टॉल धारकांनी विविध ठिकाणी प्लास्टिक पेपर्स वापरुन अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. अतिक्रमण धारकांना कायदेशीर पद्धतीने वन विभागाकडून सुरवातीला नोटीस देण्यात आल्या असून वन विभागामार्फत अवैध झोपड्या काढण्यात आल्या. अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर किल्ले सिंहगडाला आसलेला ऐतिहासिक वारसा; तसेच गडाचे सौंदर्य अबाधित राहणार आहे. स्टॉल धारकांना निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत सोय करणेबाबत वनविभाग विचाराधिन असून, संबंधित अतिक्रमण धारकांना समान रोजगार निर्मितीचा प्रश्न संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांमार्फतच सोडविण्यात आला आहे.
अतिक्रमण काढल्यानंतर पार्किंगची देखील जागा विस्तरणार आहे. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांना पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. परिणामी शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळता येईल. या अतिक्रमण मोहिमेला पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी, संस्थांनी सकारात्मक सहकार्य केल्याने वनविभागातर्फे सांगण्यात आले. ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनखाली उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार, प्रदीप संकपाळ, मुकेश सणस, सुशील मंतावार, संतोष चव्हाण, हनुमंत जाधव, अजित सुर्यवंशी यांनी केली.