सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम मोदींनी केले नाही; ठाकरेंची टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ नोव्हेंबर । गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात. यास ढोंग नाही म्हणायचे तर काय?, असा सवाल आज ठाकरेंच्या शिवसेनेने केला.

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून सावरकरांवरून सध्या चाललेल्या वादावर ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. ठाकरेंनी म्हटले आहे की, वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीचा विषय काढताच भाजपवाल्यांचे निषेधाचे नागोबा बिळातून बाहेर पडतात व फूत्कार सोडतात, पण ही संधी या नागोबांना राहुल गांधी वारंवार का देतात, हाच संशोधनाचा विषय आहे! महाराष्ट्र वीर सावरकरांना मानतो, आदर करतो. त्यांच्या शौर्याचा सन्मान करतो, करत राहील

ठाकरेंनी म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले, पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधी यांनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरे झाले असते. ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले. जनतेचा प्रतिसादही उदंड लाभला. हे सर्व उत्तम चालले असताना राहुल गांधी यांना सावरकरांच्या कथित माफीचा विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हती हे खरेच. त्यामुळे नकली हिंदुत्ववाद्यांना सावरकर प्रेमाचे आचकेउचके लागले.

ठाकरेंनी म्हटले आहे की, राहुल गांधी व त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी मिंधे गटाचे लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले. मात्र पुण्यात या लोकांनी राहुल गांधींना सोडून सावरकरांनाच जोडे मारल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. सावरकरांचा अपमान राहुल गांधींनी केला व त्याचा निषेध केला पाहिजे, पण निषेध करण्यासाठी ज्यांना रस्त्यावर उतरवले त्यांना राहुल व सावरकर यांच्यातला फरक कळला नाही, असा एपंदरीत हिंदुत्वाचा गोंधळ सरकारात उडालेला दिसतोय.

ठाकरेंनी म्हटले आहे की, वीर सावरकर हे अंदमानच्या काळ्या पाण्यातून इंग्रजांची माफी मागून सुटले की फ्रान्स येथे मारिया बोटीतून उडी मारून निसटले, हा काही राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा विषय नव्हता. देशातील नफरत, द्वेषाचे पसरत चाललेले जहर, महागाई, बेरोजगारी या मुद्दय़ांवर लोकांना जागे करण्यासाठी राहुल गांधींची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. राहुल गांधी रोज साधारण 15 किलोमीटर चालतात व त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात जनता चालत असते. राहुल गांधी यांची जी प्रतिमा गेल्या काही वर्षांत भाजपने तयार केली त्याला छेद देणारी त्यांची ही ‘भारत जोडो’ यात्रा आहे. भारतीय जनता पक्ष कितीही ‘नाही नाही’ म्हणत असला तरी ‘भारत जोडो’ यात्रेची दखल त्यांना घ्यावी लागत आहे. राहुल गांधी यांचे श्रम, कष्ट त्यामागे आहेत; पण अचानक वीर सावरकरांच्या नावाने त्यांचे मन अस्थिर होते व सर्व केलेल्यावर पाणी पडते.

ठाकरेंनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात येऊन सावरकरांच्या कथित माफी प्रकरणाचा कोळसा उगाळल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांची अवस्थाही अवघडल्यासारखी झाली असेल. राहुल गांधी यांनी हिंगोलीत विधान केले की, ‘‘सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसविरोधात सावरकर इंग्रजांसोबत काम करायचे.’’ त्याशिवाय, ‘मला मुक्त करा, मी बाहेर येताच आपल्या आज्ञाधारक सेवकाप्रमाणे काम करीन,’ असेही सावरकर यांच्या याचिकेत म्हटल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले व त्याबाबतची कागदपत्रे पत्रकारांसमोर फडकवली. या सगळय़ाची गरज नव्हती, पण हे राहुल गांधी यांना सांगायचे कोणी?

ठाकरेंनी म्हटले आहे की, सावरकर हे देशातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. नाशिकच्या जॅक्सन वधाच्या खटल्यातील ते मुख्य आरोपीच होते. ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी सशस्त्र क्रांतिकारक तयार करण्याचे काम सावरकरांनी केले. ब्रिटिशांना सावरकरांचे भय वाटत होते म्हणूनच त्यांना तब्बल पन्नास वर्षे काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावून अंदमानात धाडण्यात आले. इतकी भयंकर शिक्षा ठोठावलेले या भारतमातेचे ते एकमेव सुपुत्र होते. अंदमानात सावरकरांनी 10 वर्षांची यातनामय शिक्षा भोगली. या काळात त्यांनी पाचेक वेळा ब्रिटिश सरकारकडे दया याचिका केली व त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तुरुंगात सडत मरण्यापेक्षा बाहेर पडून थांबलेले क्रांतिकार्य पुढे न्यावे, असे त्यांना वाटत असावे. पुन्हा इकडे बाहेरही स्वतः महात्मा गांधी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करीत होते. सावरकरांनी तेव्हाच्या ब्रिटिश सरकारकडे दया याचिका करायला हरकत नाही हे महात्मा गांधींचेही मत होते.

सगळ्यांनीच इतिहासाशी वैर घेतले

ठाकरेंनी म्हटले आहे की, सावरकरांच्या सहा दया याचिका सरकारने फेटाळून लावल्या हेसुद्धा तितकेच खरे. अटी व शर्तींवर पुढे सावरकरांची सुटका झाली तरी त्यांच्यावर ब्रिटिशांची करडी नजर होती. सावरकर सरकारकडून उपजीविकेसाठी पेन्शन घेत होते ते अत्यंत तुटपुंजे होते. यावर स्वतंत्रपणे बोलता येईल; पण ब्रिटिश साम्राज्याचा पाया जेवढा महात्मा गांधींच्या अहिंसक चळवळीने हलवला, तेवढाच तो सावरकरांसारख्या क्रांतिकारकांच्या लढय़ामुळेही उखडला. महात्मा गांधींनाही त्याची कल्पना होती. पन्नास वर्षांची शिक्षा ठोठावताच ‘‘तोपर्यंत तुमची सत्ता राहील काय?’’ असा भेदक प्रश्न विचारून साखळदंडात जखडलेले सावरकर अंदमानकडे निघालेल्या बोटीत चढले. काय हा आत्मविश्वास! हे सर्व इतिहासात नोंदवले आहे, पण इतिहासाशी वैर अलीकडे सगळय़ांनीच घेतलेले दिसते.

अकलेचे शत्रू
ठाकरेंनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा स्वातंत्र्य लढय़ात काडीइतकाही संबंध नव्हता. तसा तो सावरकरांच्या विचारधारेशी नव्हता. सावरकरांच्या हिंदू महासभेवर तर या लोकांनी आगपाखडच केली. त्यामुळे सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करण्याचे उद्योग त्यांनी बंद करावेत. मिंधे गटाचे लोक तर राहुल गांधी समजून वीर सावरकरांनाच रस्त्यावर जोडे मारीत आहेत. असे हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकरांचे विचार समजवायला निघाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *