४० सोडाच, पण महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही; फडणवीसांनी बोम्मईंचा दावा निकालात काढला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांसंदर्भात केलेला दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उलट सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढून सीमाभागातील कारवार, बेळगाव, निपाणी ही गावे महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. आपण एकाच देशात राहतो. त्यामुळे हा शत्रुत्त्वाचा नव्हे तर कायदेशीर वाद असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नासंदर्भात एक बैठक घेतली होती. या बैठकीत सीमाभागातील मराठी बांधवांन कायदेशीर मदत करण्याचे ठरले होते. तसेच त्यांना नवीन योजना आणि सुविधांचा लाभ देण्यासंदर्भातही निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे आपणही काहीतरी करावे, या उद्देशाने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांचा कर्नाटकात समावेश करण्याविषयीचे वक्तव्य केले असावे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

जत तालुक्यातील ४० दुष्काळी गावांनी २०१२ साली कर्नाटकमध्ये सामीर होण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव आत्ताचा नाही. मी मुख्यमंत्री असताना या गावांना पाणी मिळवून दिले. तसेच या गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही म्हैसाळ सुधारित योजनेत या गावांचा समावेश करण्यास मान्यता दिली होती. मात्र, नंतरच्या काळात कोरोनामुळे हा प्रकल्प रखडला असावा. आता आम्ही म्हैसाळ प्रकल्पाला तातडीने मंजुरी देणार आहोत. या योजनांसाठी केंद्र सरकार पैसा देणार असल्याने निधीची अडचण नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्त्वव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले. शिंदे-फडणवीस सरकारने सीमाभागाबाबत बैठक घेऊन वेगाने हालचाली सुरु केल्या. या सगळ्याला काऊंटर करण्यासाठी बसवराज बोम्मई यांनी ४० गावांच्या कर्नाटकात सामील होण्याच्या ठरावाचा जुना मुद्दा उकरून काढला. १५ वर्षांपूर्वी जत तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होता, तेव्हाचा हा मुद्दा आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा आताचा दावा हा हास्यास्पद आहे. त्याला कवडीइतकी किंमत देण्याची गरज नाही, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, आम्ही जत तालुक्याला पाणी पुरवले. अहो कर्नाटकलाच पाणी आमच्या कोयना धरणातून जातो. आमचंच पाणी घ्यायचं आणि आम्हाला देतो म्हणायचं. मी गेली अनेक वर्षे या भागाचा आमदार आहे. कोयना धरणातूनच खाली कर्नाटकात पाणी जाते. तिकडे पाणी संपते तेव्हाही कर्नाटकचे मुख्यमंत्री कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतात. आम्ही जे पाणी सोडतो तेच कर्नाटकातील तुमच्या गावांना मिळते, अशा शब्दांत शंभुराज देसाई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाई आहे. आम्ही या गावांना पाणी देऊन मदत केली आहे. या ४० गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. कर्नाटक सरकार या ठरावाचा गांभीर्याने विचार करत आहे, असे बसवराज बोम्मई यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकची महाराष्ट्रातील भूभागावर वक्रदृष्टी असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *