बेळगावात बोलावून मला अटक करण्याचा भाजप सरकारचा डाव!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ नोव्हेंबर । कर्नाटकातील भाजप सरकारकडून बेळगावात बोलवून मला अटक करण्याचं कटकारस्थान रचले जात आहे. दोन दिवसांपूर्वी याबाबतची माहिती माझ्या कानावर आली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगाव न्यायालयाने समन्स दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील. माझ्या भाषणात प्रक्षोभक काय होते? तेच कळत नाही. पण 2018 साली केलेल्या भाषणाची आता दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ असा की, मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल, ही माझी माहिती आहे. बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावं, अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी चार दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगलीचा भाग तोडून कर्नाटकाला जोडण्याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी या विषयाला तोंड फोडलं. पण महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आम्ही लढा देत आहोत. त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींमध्ये गुंतवणे, बेळगावात बोलवून हल्ले करणे, असे कारस्थान कर्नाटकता शिजताना दिसतयं. महाराष्ट्र सरकारने याची दखल घ्यायलया हवी, असे संजय राऊत म्हणाले.

शिवसेना ही सीमाबांधवांसाठी कटिबद्ध आहे. शिवसेनेने सीमाबांधवांसाठी 169 हुतात्मे दिले आहेत, 170 वा हुतात्मा व्हायला तयार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सीमाप्रश्नासाठी तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगला होता. शिवसैनिकांनी तेव्हा तीन दिवस मुंबई पेटवली होती. त्याच्यामुळे ती धग आमच्यात कायम आहे. मला अटकेची भीती नाही, मग ते कर्नाटकचे सरकार असो किंवा अन्य कुठले, असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *