महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर। मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधाने करण्याची मालिकाच सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांचा अवमान करणारे विधान केले होते. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केली होता. त्यातच आज शिंदे सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा महाराजांविषयी वादग्रस्त विधान केलं. यावर आज उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
उदयनराजे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून शिवाजी महाराजांंविषयी वादग्रस्त विधाने करण्यात येत आहे. मोठमोठे नेते ही विधाने करत आहेत. शिवाजी महाराजांचे नाव घेतात, त्यांच्याविषयीच वादग्रस्त विधाने करत आहेत. माध्यमांनी यावर आवाज उठवला पाहिजे. सर्वच राजकीय पक्षातील लोकप्रतिनिधी वादग्रस्त विधान करणाऱ्यांविरोधात भूमिका घ्यायला हवी, असही उदयनराजे म्हणाले.
उदयनराजे पुढं म्हणाले की, त्यादिवशी मी भावूक झालो. मात्र मी काही बांगड्या भरल्या नाहीत. वेळप्रसंगी निर्णय घेऊ, असा इशारा उदयनराजे यांनी दिला. उदयनराजे सध्या भाजपचे खासदार असून शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्यांमध्ये भाजपशी निगडीत नेते आहेत. त्यामुळे उदयनराजे यांची संतप्त प्रतिक्रिया ही भाजपला इशारा मानली जात आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले भावूक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.