प्रतापगडावरील कार्यक्रमासाठी कुणाचा फोन आला नाही; उदयनराजेंनी स्पष्टच सांगितले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर। शिवप्रताप दिनानिमित्त किल्ले प्रतापगड येथे सरकारच्या वतीने भव्यदिव्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हजेरी लावली होती. परंतु कार्यक्रमात छत्रपतींचे वंशज असलेले खासदार उदयनराजे यांची गैरहजेरी प्रामुख्याने दिसून आली. मात्र या कार्यक्रमाबाबत कुणीही मला फोन केला नव्हता असं स्पष्टच उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

उदयनराजे भोसले म्हणाले की, मी देव पाहिला नाही. महाशिवरात्री, गणेश चर्तुथी ज्यादिवशी असते तेव्हाच साजरी होते. शिवाजी महाराजांबद्दल तारखांचा घोळ का? १० नोव्हेंबरलाच शिवप्रताप दिन साजरा होतो. मला कुणी फोन केला नव्हता. आज सकाळी पत्रिका आली तेव्हा कार्यक्रम आहे समजलं. मला कुणीही बोललं नव्हतं. ज्यावेळी सरकार स्थापन झाले तेव्हा मी कार्यक्रम ठेवतो असं म्हटलं होतं. शिवजयंती ३ दिवस साजरी करतात. ही एकप्रकारे अवहेलना नाही का? परदेशातील लोक विचारतात खरी शिवजयंती कुठली? छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांना पकडून नेले नव्हते स्वत: गेले होते. माफीनामा अजिबात लिहिला नाही. घातपात होऊ शकतो माहित असताना ते दिल्लीला गेले होते. त्याला शूरता म्हणतात असं उदयनराजेंनी सांगितले.

प्रत्येकजण वैयक्तिक एका समाजाचा विचार करायला लागला तर या देशाचे किती तुकडे होतील? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने देशाला अखंड ठेवलंय. जर छत्रपतींच्या विचारांचा विसर पडला तर काय होईल. प्रत्येक राज्य एक वेगळा देश म्हणून विचार करणार आहोत का? असा संतप्त सवाल छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी विचारला.

छत्रपतींनी विचार केला असता तर आजही राजेशाही असती

छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला लोकशाहीचा ढाचा घालून दिला. अजूनही अनेक देशात राजेशाही आहे. छत्रपतींनी विचार केला असता राजेशाही अबाधित ठेवायची तर आजही देशात राजेशाही असते. राज्य कारभारात लोकांचा समावेश व्हावा. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. त्याला आज मंत्रिमंडळ म्हणतात. छत्रपतींच्या विचाराने सर्व लोक एकत्रित आले. स्वराज्य निर्माण झाले असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रत्येक पक्ष वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, आदर्श मानतात. पण आता सर्वधर्म समभावाची व्याख्या बदलीय का असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपतींचे नाव घ्यायचे आणि जे आपल्याला सोयीचं आहे तेवढेच घ्यायचे. शिवरायांमुळे भारतात लोकशाही आहे. सर्व पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना राष्ट्रद्रोहाची शिक्षा द्यावी. पहिला समाज, मग जात वैगेरे आली. लोकशाहीत जनता राजे आहे. या जनतेला जबाबदारीने दिशा देणं राजकारण्याचं काम आहे. राज्यपालांसारखं उद्या कुणीही बोलेल. हा देश अखंड ठेवायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा तुमचा मुख्य पाया पाहिजे असं छत्रपती खासदार उदयनराजे यांनी म्हटलं.

दरम्यान, प्रत्येकाला वाटतं देश महासत्तेकडे गेला पाहिजे. देश एकत्रित राहायला हवा. जगातील इतर देशांना आपला देशाचा हेवा वाटला पाहिजे. देश असावा तर भारतासारखा म्हटलं पाहिजे. देशाच्या सीमा आत्ता पडल्यात. पहिल्या नव्हत्या. राज्यपालांनी हे बोलण्याचं धाडस कसं केले. उद्या त्यांच्यापेक्षा मोठ्या पदावर असतील ते बोलतील. केवळ नावापुरता, पुतळे बांधण्यापुरता शिवरायांचा वापर करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *