54 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ डिसेंबर। सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीत महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या ऋतुराजने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली आहे. त्याने सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम सामन्यातही शतकी खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीतील हे त्याचं चौथं शतक आहे. त्यानं क्वार्टर फायनलमध्ये द्विशतक केलं होतं, तर सेमीफायनलमध्ये शतक झळकावलं होतं.
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीत संघाचं नेतृत्वाची धुरा पेलली आहे. अंतिम सामन्यात त्याने 131 चेंडूत 108 धावा केल्या. विजय हजारे ट्रॉफीत 5 सामन्यात त्याने 220 च्या सरासरीने एकूण 660 धावा केल्या असून नाबाद 220 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडुंमध्ये ऋतुराज टॉपवर पोहोचला आहे. विजय हजारे ट्रॉफीत 2021 पासून ऋतुराज गायकवाडने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने गेल्या 10 डावात 8 शतके लगावली आहेत. याशिवाय आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीत त्याने 12 शतके केली आहेत. सर्वाधिक शतकांच्या बाबतीत त्याने अंकित बावने आणि रॉबिन उथप्पा यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला आहे.
ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या जोरावर 50 षटकात 9 बाद 248 धावा केल्या. ऋतुराजने त्याच्या शतकी खेळी 131 चेंडूत 7 चौकार आणि 4 षटकार लगावले. तर अजीम काझीने 37 तर सत्यजीतने 27 धावा केल्या. सौराष्ट्रकडून चिराग जानीने हॅटट्रिकसह सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर जयदेव उनादकटने एक गडी बाद केला.
यंदाच्या हंगामात तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडुंमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. या यादीत तामिळनाडुचा फलंदाज एन जगदीशन असून त्याने हंगामात 8 सामन्यात 830 धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५ शतकांचा समावेश आहे. याआधी ऋतुराज गायकवाडने क्वार्टर फायनलमध्ये 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली होती. तर सेमीफायनलमध्ये 126 चेंडूत 168 धावा केल्या होत्या. त्याने लिस्ट क्रिकेटच्या 71 डावात एकूण 15 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत.