महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ डिसेंबर । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासोबतच छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ उद्या शनिवारी कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचा आदेश (कलम 144) लागू करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीने घेतलेल्या आक्रमक भुमिकेमुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटला आहे. कोल्हापुरात बेळगावला जाणारी वाहनेही रोखण्यात येत आहे. तसेच, कोल्हापुरात ग्रामपंचायती निवडणुकाही होत आहे. त्यामुळे वातावरण आणखी चिघळू नये म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी गुरुवारी 8 डिसेंबर रोजी जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
मिरवणुका, सभांनाही बंदी
आदेशानुसार, कोल्हापुरात 15 दिवसांसाठी जमावबंदी असेल. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसेच मिरवणुका आणि सभांनाही बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.
18 डिसेंबरला मुंबईत आंदोलन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 17 डिसेंबररोजी राज्य सरकारविरोधात मुंबईत महामोर्चाचे आयोजन केले आहे. याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडी नेत्यांचीही यासंदर्भात बैठक झाली. बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव, शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते. यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तसेच छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ उद्या शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील वातावरण चिघळू नये म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहेत.