Cold Wave Maharashtra News : पुढच्या 48 तासांत गारठा वाढणार, पुण्यात अशी असेल स्थिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ जानेवारी । राज्यात थंडीची लाट आल्याने बऱ्याच जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवसा उन्हाच्या झळांसोबत बोचरी हवा आणि रात्री हुडहुडी भरवणारी थंडी यामुळे लोकांच्या शरिरावर परिणाम होताना दिसत आहे. अशा वातावरणामुळे आजार वाढत आहेत. राज्यात मागच्या दोन दिवसांपासून पारा घसरला आहे तो कायम पुढचे दोन दिवस राहण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तवली आहे. जळगाव, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असून काल (दि.12) जळगावचा पारा 7 अंशांवर असून सलग पाचव्या दिवशी नीच्चांकी ठरला आहे. गेल्या पाच दिवसांपासून उत्तर भारतात थंडी व दाट धुके असून शीत लहरी त्या भागातून महाराष्ट्रात येत आहेत. यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे.

 

पुढचे दोन दिवस अशीच परिस्थीती राहणार आहे. दरम्यान पुण्याचा पारा 8.3 अंशांवर खाली गेला आहे. तर औरंगाबाद 9.4, नाशिक 9.2, नागपूर 11 अंश इतके तापमान होते. असे वातावरण 14 जानेवारीपर्यंत राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात काल (दि.12) पारा 15 अंशावर स्थिर राहिला. सलग दुसऱ्या दिवशी किमान तापमान कायम होते, यामुळे थंडीचा कडाकाही कायम राहिला. दरम्यान, सायंकाळी थंडीची तीव्रता आणखी वाढली. तीन दिवसांपासून कोल्हापुरात थंडीचा जोर आहे. पारा 13 अंशापर्यंत खाली आला होता. दिवसभरात कोल्हापुरात 14.9 अंश किमान तर 31.2 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.

उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडेयेत असल्याने मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान 10 ते 16 अंशांच्या दरम्यान होते. कमाल तापमानात वाढ झाली असून, जवळपास सर्वच ठिकाणी तापमान 30 अंशांच्या वर गेले आहे.

दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 32.1 (8.3), जळगाव 30.8 (7.0), धुळे 30.0 (6.2), कोल्हापूर 31.7 (14.9), महाबळेश्वर 28.3(13.1), नाशिक 30.4 (9.2), निफाड 30.5 (5.5), सांगली 31.2 (12.6), सातारा 31.6(10.8), सोलापूर 33.5 (14.0), सांताक्रूझ 31.2 (16.3), अलिबाग 30.6 (15.6), रत्नागिरी 34.2 (15.5), औरंगाबाद 30.6 (9.4), परभणी 31.6 (12.5), अकोला 33.1 (12.0), अमरावती 32.0 (10.7), बुलढाणा 31.6 (14.0), चंद्रपूर 28.8 (13.0), गडचिरोली 30.2(11.6), गोंदिया 30.0(10.5), नागपूर 30.4 (11.0), वर्धा 31.2(11.9), वाशीम 32.8 (12.2), यवतमाळ 31.7 (11.0) तापमानाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *