महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ जानेवारी । वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे वादंग निर्माण झाला आहे. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या वादानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. तसेच भाजपसोबतही जावू शकतो, असही ते म्हणाले. (Prakash Ambedkar news in Marathi)
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोणताही राजकीय पक्ष एकमेकांचा शत्रू नाही. सगळे भारतीय आहेत. टोकाचे मतभेद असू शकतात. आमचे आणि भाजपचे टोकाचे मतभेद आहेत. यापूर्वीही आमचे मतभेत समोर आले आहेत. आरएसएस-भाजप आजही मनुस्मृती मानते. आमचा लढा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. भाजप मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीत काम करण्यास तयार असतील तर आम्ही भाजपसोबत बसायला तयार आहोत, अस आंबेडकर यांनी म्हटलं.
ते पुढं म्हणाले की, मला विचारण्यात आलं होतं की, कोणती कृती केली की म्हणजे तुम्ही म्हणाल भाजप आणि आरएसएसने मनुस्मृती सोडली. मी म्हटलं की बाबासाहेबांनी जे महाडला केलं, तेच मोहन भागवतांनी नागपूरला करावं. मनुस्मृती हा काही धर्मग्रंथ नाही. केवळ हिंदू धर्मातील सामाजिक-राजकीय व्यवस्था सांगणारा ग्रंथ आहे. त्यात आरएसएस-भाजप बदल करणार असेल तर, जो बदल सरदार पटेल यांनी करून घेतला होता, तो त्यांनी मनाने स्वीकारावा. मग ते आमचे शत्रू नाही. राजकीय समझोता कधीही होऊ शकतो, असंही आंबेडकर म्हणाले.