पुढील 2 ते 3 दिवसांत राज्यात थंडी वाढणार, रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ जानेवारी । राज्यात पावसाला पोषक वातावरण असून सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच, शनिवारी राज्याच्या किमान तापमानातही घट झाली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात शनिवारी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तापमानाचा पारा 11.3 अंशांवर घसरला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून, हा पट्टा 31 जानेवारीला श्रीलंकेकडे सरकणार आहे. दरम्यान, या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा या भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या ठिकाणी पावसाची शक्यता

आज (ता. 29) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, तसेच विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, नगर, जालना, बीड जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान 11 ते 20 अंशांच्या दरम्यान आहे. ढगाळ वातावरणामुळे दुपारच्या वेळी राज्यात उकाडा जाणवत आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे राज्यातील उच्चांकी 34.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

बळीराजा पुन्हा धास्तावला

दरम्यान, खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता अवकाळी पावसामुळेही रब्बी पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. गहू, हरभरा, मोहरीनंतर आता कांदा पिकाला देखील वाढती थंडी आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जास्त थंडीमुळं बुलढाणा, नाशिक, अहमदनगर, धुळे यासह अनेक जिल्ह्यांतील शेतकरी चिंतेत आहेत. पावसामुळे पिके आडवे होण्याची तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा धास्तावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *