तुकाराम महाराजांच्या वक्तव्यावरून बागेश्वर बाबांना उपरती, वारक-यांसह महाराष्ट्राची हातजोडून मागितली माफी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ फेब्रुवारी । बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना त्यांनी तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता उपरती झाली आहे. त्यांनी वारकरी संप्रदायाची हात जोडून माफी मागितली आहे. संत तुमकारमांना त्यांच्या पत्नी दररोज मारहाण करत होत्या. त्यामुळे त्यांनी देवाचा धावा केला, अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

नेमके शास्त्री यांनी काय म्हटले होते?
शास्त्री यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत, ”महाराष्ट्रातील एक संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत असत. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुम्ही दररोज बायकोचा मार खाता तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का? त्यावर तुकाराम महाराज यांनी त्या व्यक्तीला उत्तर दिले की मला मारहाण करणारी बायको मिळाली, ही देवाचीच कृपा.

तुकाराम महाराजांच्या या उत्तरावर त्या व्यक्तीने पुन्हा प्रश्न केला की ही देवाची कृपा कशी काय? त्यावर तुकाराम महाराज म्हणाले, प्रेम करणारी बायको मिळाली असती तर मी देवा ऐवजी पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मला देवाच्या भक्तीची गोडी लागली नसती. तसेच देवाची सेवा करण्याची संधीही मिळाली नसती.”, असे शास्त्रींनी म्हटले होते.

शास्त्रींच्या या व्हिडिओचा निषेध
दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांचा सर्व स्तरांमधून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी देखील शास्त्री यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.

निषेधानंतर शास्त्रींना उपरती
शास्त्रींच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. त्यानंतर त्यांना उपरती झाली. त्यांनी महाराष्ट्राची हात जोडून माफी मागतो, असे म्हणत आपले शब्द मागे घेतले.

शास्त्री म्हणाले, तुकाराम महाराज हे महान संत असून तेच आपले आदर्श आहेत. आपल्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला. त्यामुळे शब्द मागे घेत असून धीरेंद्र शास्त्री यांनी हात जोडून महाराष्ट्राची माफी मागितली आहे.

बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे चर्चेत आले आहेत. त्यानंतर बरेच दिवस शास्त्री आणि अंनिस यांच्यात एकमेकांवर टीका करणे सुरू होते. त्यानंतर संत तुकाराम महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याने ते पुन्हा चर्चेत आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *