Maharashtra Weather Update : फेब्रुवारीतच तापमानाचा आकडा इतका ; एप्रिल मे सहन करायचा तरी कसा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ फेब्रुवारी । देशातील हवामानात होणारे बदल, पश्चिमी झंझावाताचा कमी झालेला वेग अशी एकंदर परिस्थिती पाहता फेब्रुवारी (February) महिन्यातच तापमानवाढीचा सामना करावा लागत आहे. राजस्थान, हरियाणा, (Himachal Pradesh) हिमाचलमध्येही आता थंडीचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेलं असून, महाराष्ट्रातही याचे परिणाम दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात ऐन फेब्रुवारीतच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

अकोल्यात (Akola) दिवसा 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मागील दहा वर्षातील कमाल तापमानाचा हा उच्चांक ठरत आहे. तर, नागपुरातही पारा 38 अंशांवर गेला आहे. सकाळच्या वेळी उष्णता आणि रात्री थंडी असं चित्र सध्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. फेब्रुवारीपासूनच सुरु झालेला हा उन्हाळा आता ऐन मार्च ते जून या काळात कसा असेल याच विचारानं अनेकांना घाम फुटू लागला आहे. दरम्यान पुढील चार दिवस (Nagpur) नागपूरसह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोलीत तापमान 40 अंशांच्याही पलीकडे जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

कोकणवासियांसाठीही इशारा…
पुढील दोन दिवस कोकणात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या धर्तीवर इथं तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या घरात राहण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागांत तापमानाचा आकडा वाढतच असेल. त्यातच आकाश निरभ्र असल्यामुळं इथं सूर्यकिरणांमुळं जाणवणारी उष्णता तुलनेनं अधिक असेल.

पिकांवरही उन्हाळ्याचा परिणाम…
दिवसागणिक सातत्यानं वाढत्या उन्हाचा परिणाम शेतमालावरही होताना दिसत आहे. जिथं रब्बी पीक आणि भाजीपाल्याचं नुकसान होताना दिसत आहे. तापमानात एकाएकी 3 ते 4 अंशांनी वाढ झाल्यामुळं हरभऱ्याची फुलंही गळून पडली आहेत. तर, गव्हाच्या ओंब्याही करपू लागल्या आहेत. ज्यामुळं येत्या काळात या गोष्टींच्या किमतीही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *