महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ फेब्रुवारी । केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. नांदेड, परभणी, जालन्याचा महामार्ग पुर्ण झाला, की नांदेड ते पुणे या शहरातील अंतर आता अवघ्या साडेतीन तासांत कापता येणार आहे, असा सुखद दिलासा गडकरींनी दिला आहे. नितीन गडकरी नांदेडमध्ये बोलत होते.
नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदेडच्या (Nanded) गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानाव विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी नांदेड ते पुणे या शहरातील अंतर आता अवघ्या साडेतीन तासांत कापता येणार, असं म्हटलं आहे.
नागपूर ते रत्नागिरी (Ratnagiri) राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. नांदेडसह ११ जिल्हे या महामार्गाला जोडणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. या प्रकल्पाला ३० हजार कोटी रुपये इतका खर्च होणार असून हा महामार्ग विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोडला जाणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं आहे.
नांदेड, परभणी, जालन्याचा महामार्ग पुर्ण झाला, की नांदेड ते पुणे या शहरातील अंतर आता अवघ्या साडेतीन तासांत कापता येणार आहे, असा सुखद दिलासा गडकरींनी दिला आहे. यामुळे दोन्ही शहराच्या दळणवळणाला मोठी गती येणार असल्याचंही गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
माहुरला लिफ्ट, स्कायवॉक होणार
तीर्थक्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष असून, माहुरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी स्वयंचलित पायऱ्या आणि स्कायवॉक करण्याचा प्रकल्प मंजुर केला आहे. त्यासाठी सात कोटी रुपये मंजुर करुन घेतले आहेत. मार्च महिन्यात मी भूमिपुजन करण्यासाठी माहुरला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.