Unseasonal Rain : शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ ; राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ मार्च । राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भार टाकली आहे. हवामान विभागाकडून राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असतानाच, पालघर , नाशिक आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

पालघर जिल्ह्यातील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस कोसळला. अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे.

पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि पालघरच्या काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी, बागायतदार यांच्यात पुन्हा चिंतेत भार पडली आहे. आंबा त्याचप्रमाणे इतर रब्बी पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर द्राक्षे बागायतदार मोठ्या अडचणीत अडकला आहे. काहींच्या द्राक्षाच्या बागा आहेत. तर काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव नसल्यामुळे काहींनी कापूस साठवून ठेवला आहे. त्याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष यांसह भाजीपाला पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर अवकाळी पावसाच्या रुपाने नवं संकट उभं राहिलं आहे.

तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *