महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ मार्च । शिवसेनेमध्ये बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा केला खरा पण अजूनही मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार झालेला नाही. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या पदरी काहीच न पडल्यामुळे अजूनही ते वेटिंगवर आहे, अशातच बच्चू कडू यांनी आम्ही गद्दारी केली, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, अशी इच्छाच बोलून दाखवली आहे.
अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाला बच्चू कडू यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी बोलत असताना बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री बनण्याची इच्छाच बोलून दाखवली आहे.
‘प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे, आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे, लोक आम्हाला म्हणाले गद्दारी केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे असे म्हणत “तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते तो हमे भी बनना है….”आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं.
यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्रिपदावरील आपली आकांक्षा व्यक्त केली. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
‘आपल्या अमरावतीवाल्यांचा पक्ष आहे, हा काही दिल्ली-मुंबईवाला पक्ष थोडी आहे. आपल्या मातीतला पक्ष आहे, लोक म्हणतात आम्ही गद्दारी केली आहे, आम्ही कशाची गद्दारी केली आहे? आमचा स्वतंत्र्य पक्ष आहे, तुम्ही जर मुख्यमंत्री होत आहात, तर आम्हाला सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं आहे. आमचं पण राजकारण आहे, आम्ही सुद्धा तसं करू शकतो – बच्चू कडू