महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । राज्याचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री या नात्याने प्रथमच अर्थसंकल्प मांडणार आहेत. (Maharashtra Budget ) देवेंद्र फडणवीस हे अर्थशास्त्राचे अभ्यासक, जाणकार समजले जातात. अर्थखात्याचे मंत्री झाल्यावर त्यांचं हे पहिलंच बजेट आहे. दरम्यान, आर्थिक पाहणी अहवालात राज्याचा विकासदर 6.8 टक्के राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांद्वारे ते जनतेला दिलासा देणार का याची उत्सुकता आहे. दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यात बजेटला मंजुरी दिली जाईल. दुपारी 2 वाजता विधानसभेत बजेट मांडलं जाईल. ग्रामीण आणि शहरी भागाचा समतोल साधत काही मोठ्या घोषणा बजेटमध्ये असतील अश चर्चा आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यात शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी काय घोषणा केल्या जातात याकडे सर्वांचं लक्ष आहे. आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या प्रगतीचा वेग मंदावल्याचं दिसतंय. त्यामुळे कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रावर सरकारची भिस्त आहे. कोरोना संकट ओसरल्यानंतरही राज्याच्या प्रगतीची चाकं वेगाने फिरत नसल्याचं आकडेवारीवरुन दिसते.
गेल्यावर्षी ठेवलेलं 12.1 टक्के आर्थिक विकासाचं उद्दीष्ट साध्य करण्यात अपयश आले आहे. हा दर 9.1 टक्क्यांवर आलाय. तर पुढील वर्षासाठी तो केवळ 6.8 टक्के असेल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त झालाय. त्यामुळे आता शिंदे फडणवीसांचं बजेट राज्याला काय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ठळक बाबी
– राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2.5 टक्के आहे.
– राज्यात नोव्हेंबर, 2022 अखेर एकूण 1,543 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत.
– योजनेच्या सुरुवातीपासून नोव्हेंबर, 2022 पर्यंत राज्यातील गरीब व गरजू व्यक्तींना एकूण 12.22 कोटी शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले.
– प्रत्यक्ष महसुली जमा 2,51,924 कोटी (अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 62.4 टक्के) आहे.
– राज्याचा महसुली खर्च 4,27,780 कोटी अपेक्षित आहे.
– सन 2022-23 च्या खरीप हंगामामध्ये 157.97 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण करण्यात आली.
– मागील वर्षाच्या तुलनेत तृणधान्ये, तेलबिया, कापूस व ऊस यांच्या उत्पादनात अनुक्रमे 10 टक्के, 19 टक्के, 5 टक्के व 4 टक्के वाढ अपेक्षित
– कडधान्याच्या उत्पादनात 37 टक्के घट अपेक्षित आहे
– सन 2022-23 च्या रब्बी हंगामामध्ये 57.74 लाख हेक्टर क्षेत्रांवर पेरणी पूर्ण करण्यात आली.