महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ मार्च । नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस ज्या मार्गावरून धावत आहे, त्या मार्गाचे श्रेणीवर्धन (अपग्रेडेशन) करून वेग ताशी १३० किमीवरून १६० किमी करण्याचे नियोजन दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे आहे. या रुळाचा श्रेणीसुधार होताच वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावर अधिक वेगाने धावू शकणार आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचा नागपूर विभागाने नागपूर ते दुर्ग २६१ किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर अधिक गतीने गाड्या धावण्यासाठी रुळांची श्रेणी सुधारणा करण्याबाबत नियोजन करीत आहे. सध्या या मार्गावरून वंदे भारत एक्सप्रेस ताशी १३० किमी धावत आहे. वंदे भारत एक्स्प्रेसची अधितकम गती ताशी १८० किमी आहे.
नागपूर ते दुर्ग दरम्यान ११० किमी प्रतितासावरून १३० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्या १० मार्च २०२१ पासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्या आता पुढील टप्पा १६० किमी प्रतितास करण्याचा आहे, अशी माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे विभागीय वाणिज्य व्यवस्थापक रवीशकुमार सिंह यांनी सांगितले. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सध्या दुर्ग ते नागपूर दरम्यान १६० किमी प्रतितास, बालाघाट – सामनापूर १०० दरम्यान किमी प्रतितास आणि चिंदवाडा-भंडारकुंड दरम्यान वेग ताशी ८० किमी प्रतितास आहे.
हे टप्प्याटप्प्याने १०० वरून १३० किमी प्रतितास आणि ८० वरून १०० किमी प्रतितास करण्याचे उद्दिष्ट आहे, तर नागपूर ते दुर्ग दरम्यानच्या तीनही मार्गाची श्रेणी सुधार करून १३० वरून १६० किमी प्रतितास करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. रुळाची क्षमता वाढून १६० किमी प्रतितास वेगाने गाड्या धावल्यास जवळपास ४५ मिनिटे ते एक तास वेळेची बचत होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल, असेही ते म्हणाले.