महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ मार्च । उन्हाळा सुरु झाला आहे आणि सोबतच छान छान फळंही बाजारात दिसता आहेत, द्राक्ष, कलिंगड, संत्री, मोसंबी… सगळ्याच लोकांची खूप आवडती फळं आहेत ही. पण मुद्दा असा असतो की ही फळं गोड निघतील का? त्यातल्या त्यात इतर पदार्थ ठीक आहेत पण संत्री… ती कशी ओळखायची? विक्रेते तर म्हणतात, “एकदम गोड आहे बघा.. पण घरी येऊन मात्र ती आंबट निघतात.” आणि मग पारा चढतो, असं होऊ नये असं वाटत असेल तर या टिप्स हमखास फॉलो करा.
फार मोठं रॉकेट सायन्स आहे असं यात काहीही नाही. अगदी तुमच्या घरातल्या लहान बाळाला सुद्धा या ट्रिक्स शिकवल्या तर तोही म्हणेल.. बाबा असुदेत मीच घेऊन येतो. चला बघूया या टिप्स कोणत्या आहेत?
१. फळ हातात घेऊन हलकेच दाबून पहा जर ते लगेच दाबले जात नसेल तर फळ गोड आहे असे समजले जाते.
२. अनेकदा संत्र्यावर आपल्याला तपकिरी रंगाचे ओरखडे दिसतात, अनेकांना वाटत की फळ खराब झालं आहे पण असं काही नसतं, ते हवेमुळे होत असतं, वाऱ्याच्या वेगाने फळ झाडाच्या फांदीला येऊन आदळतं अन् त्यामुळे असं घडतं.
३. सगळ्यात सोप्पं.. संत्र्याचं वजन तपासून पाहा. यासाठी फक्त हातात फळ घेतल्यावर तुम्हाला एखाद्या टेनिस बॉल एवढे वजन जाणवले तर हे फळ गोड आहे समजा. अधिक वजन म्हणजे अधिक रस असे गणित असते. शिवाय संत्र्याचा वासही आपल्याला हे सांगू शकतो.
४. संत्र्याचा रंग हा एकदम चमकदार अन् केशरीच हवा अनेकदा त्या जास्त पिकल्यावर जराशा हिरवट होतात त्यामुळे एकतर पूर्ण केशरी किंवा अर्धवट हिरवा अन् केशरी रंग निवडा.
५. संत्र्याचे देठ जिथे असते, ती दांडी काढून जे बटण दिसते, ते जितके खोलगट असेल तितकंच संत्र गोड मानलं जातं.
कधीच साखरेसारखं गोड संत्र मिळणार नाही आणि चुकून मिळालं तर ते खाऊ नका कारण हे रासायनिक दृष्ट्या पिकावलेलं आहे. याच सर्वात महत्वाचं कारण म्हणजे संत्र हे लिंबू गटातील फळ आहे. त्यात व्हिटॅमिन सी अन् सिट्रिक ऍसिड असते त्यामुळे याची चव नैसर्गिकरित्या आंबट गोड असतेच.