महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ मार्च । Rain Update : उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसानं गेल्या काही दिवसांपासून चांगलंच झोडपलं आहे. त्यामुळं पिकांचं देखील बरंच नुकसान झालं आहे.
आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागानं दिलीये, यामुळं राज्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढच्या 24 तासांत काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागानं (Meteorology Department) दिली आहे.
राज्यात मागच्या 24 तासांत कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस झाला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याचीही माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान तमिळनाडूपासून कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.