![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ मार्च । कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेले कित्येक सुरू आहे. या महामार्गावरील परशुराम घाटाबाबत मोठी माहिती हाती आली आहे. मार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाट हा २७ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात यावा अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक विभाग आणि चिपळूण महसूल विभाग यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे परशुराम घाट बंद ठेवण्याबाबतचे नियोजन येत्या दोन ते तीन दिवसात होण्याची शक्यता आहे.
येत्या पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून या घाटात युद्धपातळीवरती काम सुरू आहे. परशुराम घाटात अवघड ठिकाणी काम करावे लागणार असल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याची मागणी या राष्ट्रीय महामार्ग ऍथॉरिटीकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसराची पाहणी करून जिल्हा प्रशासनाकडून येत्या २ ते ३ दिवसात या बाबतीत अंतिम निर्णय होणार आहे. हा घाट नेमका कोणत्या दिवशी व किती वेळ कसा बंद करायचा याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून येत्या २-३ दिवसांत याबाबत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच हा निर्णय घेतला जाणार आहे.

परशुराम घाटात १.२० किमी लांबीत उंच डोंगररांगा, खोलदऱ्या असल्या कारणाने चौपदरीकरणाचे काम करण्यासाठी हा भाग अवघड स्वरुपाचा आहे. उर्वरीत १०० मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या मार्गात सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने सदर भागामध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. उर्वरीत चौथ्या टप्प्याचे काम प्रगतीत आहे. उर्वरीत १०० मीटर मधील चौथ्या टप्याचे काम हे अवघड स्वरुपाचे आहे.
सदर ठिकाणी काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली कार्यरत महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सदर प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या में.कशेडी परशुराम हायवे प्रा.ली.यांनी या ठिकाणाच्या कामासाठी परशुराम घाट वाहतूकीसाठी दि. २७ मार्च २०२३ ते दिनांक ०३ एप्रिल २३ या कालावधीत ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे पावसाळयापूर्वी पूर्ण करण्यासाठी व संभाव्य जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी परशुराम घाट दि. २७ मार्च २०२२ ते दिनांक ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत दु. १२.०० संध्याकाळी ६.०० वाहतुकीसाठी बंद ठेवणे बाबत विनंती करण्यात आली आहे.