महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीरांचे विचार, स्वातंत्र्याकरिता दिलेला लढा, संघर्ष आणि खरा इतिहास घराघरात पोहोचवण्याची संधी दिली. याबाबत त्यांचे आभार मानून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःचा पक्ष बुडवण्यासाठी मरता क्या न करता अशा शब्दात राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपच्यावतीने काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते. शंकरनगर चौकातील सावरकर यांच्या पुतळ्या जवळ झालेल्या समारोप समारंभात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. सुधांशू त्रिवेदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके, खासदार कृपाल तुमाने, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख शांताक्का, राजे मुधोजी भोसले, राजे वीरेंद्र शहा, सुलेखा कुंभारे, राम हरकरे यांच्यासह यात्रेचे समन्वयक संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, सावरकर यांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तुमच्या बोलण्याचे त्यांची उंची कमी होणार नाही. आता मनाचा मोठेपणा दाखवा आणि भारतीयांची माफी मागा. इतका मोठा अक्षम्य अपराध तुम्ही केला आहे. सावरकर समस्त भारतीयांचे दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणीच खपवून घेणार नाही, असे ठणकावले.