महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । राज्यात वादळी पाऊस, गारपीट असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला गेले आहे. राज्याचे, देशाचे मुख्य प्रश्न सोडवण्यची दृष्टी ज्यांच्याकडे नाही, असे लोक लक्ष विचलीत करण्यासाठी असे काही तरी प्रकार करतात, अशा शब्दांत राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहे.
अयोध्या दौरा महत्त्वाचा आहे का?
शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. अयोध्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा अजेंड प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, आज अयोध्या दौरा महत्त्वाचा प्रश्न आहे का? राज्यात सध्याच्या घडीला अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष उत्पादक हवालदील झाला आहे.
शेतकऱ्यांची चिंता नाही
शरद पवार म्हणाले, पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हे सर्व अस्वस्थ करणारे आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांना त्याची चिंता नाही. अयोध्येच्या प्रश्नापेक्षा राज्यात अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, आज राज्याचे सर्व मंत्रिमंडळ, आमदार, खासदार अयोध्येला जाऊन बसले आहेत. याचा अर्थ मुळ प्रश्नांना त्यांना बगल द्यायची आहे.
आमची श्रद्धा शेतकऱ्यांमध्ये
शरद पवार म्हणाले, शिंदे म्हणत आहे की, आमची श्रद्धा असल्यामुळे आम्ही अयोध्येत आलो. मात्र, ते राज्यकर्ते आहेत. त्यांना जायचेच असेल तर त्यावर काही बोलता येणार नाही. मात्र, आमची श्रद्धा ही शेतकऱ्यांप्रती आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे, त्याप्रती आम्ही संवेदनशील आहोत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी कसे पुसता येईल?, त्यांना संकटात मदत कशी करता येईल?, याचा विचार केला पाहीजे.
जेपीसीला विरोध नाही
शरद पवार म्हणाले, अदानी घोटाळ्याची चौकशी झालीच पाहीजे. फक्त त्यासाठी जेपीसी योग्य नाही, अशी माझी भूमिका आहे. मी 56 वर्षे विधिमंडळाचा सदस्य राहीलो आहे. त्यामुळे मला काही तरी अनुभव असेलच ना. त्यामुळे मी जेपीसीऐवजी सुप्रीम कोर्टाची समिती सुचवली आहे. मात्र, सर्व विरोधक जेपीसीवर ठाम असेल तर त्याला माझा विरोध नाही. अदानी घोटाळ्याची जेपीसीद्वारे चौकशी करायची असेल तर त्यांनी ती करावी.
कोणत्या मुद्द्याचा आग्रह धरावा
राजकारणात सध्या अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, आपण कोणत्या मुद्द्याचा आग्रह धरला पाहीजे, हे ज्याचे त्याला कळले पाहीजे. त्यांना राजकारणासाठी शिवीगाळाचा मार्ग योग्य वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.