महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ एप्रिल । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोध्या दौऱ्यावर आहेत. ते कालच (८ एप्रिल) अयोध्येत दाखल झाले. त्यांच्यासोबत बंडखोर आमदार, भाजपा नेते, कॅबिनेटमधील मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावरून टीका केली होती. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, आता कलियुग सुरू आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आदित्य ठाकरेंना अजून खूप शिकायचं आहे. ते जे काही बोलतात त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकं प्रगल्भ ते बोलत नाहीत. अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनानंतर फडणवीस यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी एका वाक्यात आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
मुख्यमंत्र्यांनी मोजक्या घेतला समाचार
आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता, तेव्हापासून मी काम करतोय.”
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले होते की, सध्या कलियुग सुरू आहे आणि रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. ठीक आहे, पण आम्ही नक्कीच पुन्हा राम राज्य या महाराष्ट्रात आणू. हाच विचार घेऊन आम्ही चालत आहोत. ‘रघुकुल रीत सदा चल आई, प्राण जाए पर वचन न जाई…’, हे आमचे ब्रीदवाक्य आहे.