महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – बुलढाणा- विशेष प्रतिनिधी- गणेश भड : कोरोनाच्या सावटात सध्या संपूर्ण जग आहे. देशातही कोरोनाचे लाखो रूग्ण आहेत. राज्यही 50 हजारांच्या पुढे गेले आहे. मात्र आरोग्य विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नांमुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. जिल्ह्यातही कोरोनामुक्ती प्रभावी आहे. जिल्ह्यात एकूण 42 रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. आज खामगांव येथील सामान्य रूग्णालयातून तब्बल 9 रूग्णांनी कोरोनावर मात करीत घर गाठले. यामध्ये खामगांव तालुक्यातील जळका भडंग येथील 8 व टुनकी ता. संग्रामपूर येथील एका रूग्णाचा समावेश आहे. या सर्व रूग्णांना 21 मे रोजी भरती करण्यात आले होते. डिस्जार्ज मिळालेल्या रूग्णांमध्ये 4 महिला व पाच पुरूषांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 69 रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 रूग्ण मृत आहेत. तर जळका भडंग व टुनकी येथील सदर रूग्णांसह 42 रूग्णांना कोरोनाची मागील दहा दिवसांपासून कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाय योजनांमुळे सदर रूग्ण बरे झाले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून स्वागताने घरी पाठविले. त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णही आनंदाच्या भावमुद्रेत बाहेर पडले.

या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात येतात. कोरोना बाधित आढळलेल्या या रूग्णांना शासनाच्या निकषांनुसार वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे लक्षणे नसल्यामुळे बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर देण्यात दिला. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेश टापरे उपस्थित होते.

त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवावे, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे
