Raj Thackeray : सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना ‘मुद्देसूद’ पत्र ; “दादा …”

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वितरण कार्यक्रमात झालेल्या दुर्घटनेवर भाष्य केलं आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना पत्र लिहिलं असून त्यांच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

इंटरनेट आणि ई-मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे, असं म्हणत अंधारे यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे.

“घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला वगैरे वगैरे असे म्हणत उध्दव साहेबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही भाषा केली. आपण अत्यंत सिलेकटीव्ह पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते”, असं म्हणत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे.


सुषमा अंधारेंनी विचारलेले प्रश्न कोणते?

1. कोरोना महामारी ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच. पण खारघर मध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी.

2. भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एवढ्या मोठ्या गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?

3. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.

मुद्दा क्रमांक चार : कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खाजगी पीएम केअर फंड मध्ये निधी द्या असे म्हणणारे श्री देवेंद्र फडणवीस ची कोरोना काळात राजकारण करत नव्हते का ?

मुद्दा क्रमांक सहा : गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच गेले पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून करून राज्यातली एकूण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई नेते राजकारण करत नव्हते का ?

मुद्दा क्रमांक सात : सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती वारी बंद होती तशी आंबेडकर जयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का ?

असू द्या दादा मी आपल्याला फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही.
पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आपल्या पक्षातल्या देशपांडे नावाच्या एका कार्यकर्त्याला साधे खरचटलेही नव्हते तरी सुद्धा आपण काय तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. बापरे , आपली ती शून्यात हरवलेली नजर माध्यमे वारंवार दाखवत होते.

दादा , खारघरच्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकाला आपण असेच धावतपळत भेटायला गेलात का नाही ?
शेवटचा मुद्दा: कोरोना काळामध्ये माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची दखल फक्त भारतात नाही तर जगभरात घेतली गेली आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना कामगिरीचे कौतुक केले. “धारावी पॅटर्न” तर जगभर गाजला.

या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेश मध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. हा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्य यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का ?

असो , आपल्या मनात नसला तरी बहीण म्हणून माझ्या मनात कायमच स्नेहभाव आहे वृद्धिगंत व्हावा, असं म्हणत अंधारेंनी आपल्या पत्राचा शेवट केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *