शिवसेना आणि भाजपची युती का तुटली ? मविआचा जन्म कसा झाला?, शरद पवारांनीच केला खुलासा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० एप्रिल । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’चा दुसरा भाग 2 मेरोजी प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील काही महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

2019च्या विधानसभेच्या निकालानंतर राज्यात अतिशय नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना व भाजपची युती तुटली. त्यानंतर शरद पवारांच्या पुढाकारानेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी तयार झाली. शिवसेना व भाजपची युती तुटण्यामागे नेमके काय कारण होते?, यावर अजूनही भाजप व शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. मात्र, आपल्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागात स्वत: शरद पवार यांनीही या राजकीय संघर्षाबद्दल माहिती दिल्याचे समोर येत आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या जन्माची कहाणीही शरद पवार यांनी या पुस्तकात सांगितली आहे.

काय म्हटले आहे शरद पवारांनी?

शरद पवार यांनी पुस्तकात म्हटले आहे की, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019नंतर चित्र बदलले. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचे ओझे उतरवून ठेवायचे असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता. नारायण राणे हे शिवसेनेच्या दृष्टीने गद्दार. पण भाजपमध्ये विलीन करून घेत सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केले. राज्यातील 50 मतदारसंघात बंडखोरांचे आव्हान होतं. त्यातील बहुतेकांनी ठोकलेले दंड नेत्यांच्या आशीर्वादने आणि पक्षाच्या बळावर होते.

नरेंद्र मोदी व अमित शहांबद्दल

शरद पवार यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून आणि बोलण्यातून शिवसेनेविषयी फारशी सहानुभूती नसल्याचे दिसत होते. शिवसेनेच्या मात्र भाजपकडून अपेक्षा पूर्वीप्रमाणे कायम होत्या. भाजप आणि शिवसेना यांच्या संवादाची गरज असे तेव्हा शीर्षस्थ नेतृत्व मातोश्रीवर येऊन संवाद घडवत असे. पण बदलेल्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची आणि शिवसेनेची भाजपच्या नेत्यांकडून मातोश्रीवर येऊन संवाद घडवावा हीच अपेक्षा कायम होती.

भाजपचा राजकीय हिशोब

शरद पवार यांनी म्हटले आहे की, शिवसेनेची ताकद असलेल्या शहरी भागात तिचे उच्चाटन केल्याशिवाय आपल्याला राज्यात वर्चस्व स्थापन करण्यात येणार नाही असा सरळ राजकीय हिशोब भाजपचा होता. याचमुळे आपल्या राजकीय अस्तित्वावर भाजप उठला आहे, या विषयी शिवसेना नेतृत्व आणि त्यांच्या कार्यकर्त्यात तीव्र संताप होता. सत्तेत एकत्र असल्याने त्याचा उद्रेक झाला नाही. पण आग धुमसत होती. भाजप आणि शिवसेनेतील वाढलेले अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होता.

पहाटेच्या शपथिविधीबाबत काय?

शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र असलेल्या ‘लोक माझे सांगाती’च्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन 2 मे रोजी होणार आहे. शरद पवार यांच्याच उपस्थितीत वाय.बी. चव्हाण सेंटर येथे सकाळी 11 वाजता या पुस्तकाचे प्रकाशन होईल. या पुस्तकात 2019नंतरच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या पुस्तकात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी तसेच उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळावर काही भाष्य केले आहे का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *