महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ मे । पुणे : शहरात दिवसा उन्हाचा ताप, तर सायंकाळी थंडीची अनुभूती असे चित्र सध्या कायम आहे. तापमानातील घट यामुळे रात्रीच्या वेळी हवेत गारव्याची अनुभूती होत आहे. दरम्यान ढगाळ वातावरणाची स्थिती अधूनमधून होत असून पुढील तीन दिवस पुणे व परिसराला मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
गुरुवारी (ता. ४) शहर व परिसरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. दिवसा ऊन तर दुपारनंतर काहीसे ढगाळ वातावरण अशी अनुभूती होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर ही परिणाम होताना दिसून येत आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. ५) शहरात ३५.५ अंश सेल्सिअस कमाल आणि २१.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा तापमानात घट कायम होती.
हवामानाची स्थिती पाहता उत्तर कर्नाटक व परिसरावर सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यात तुरळक भागात पावसाची शक्यता कायम आहे. तर शहर आणि परिसरात रविवारपर्यंत (ता. ७) दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या राज्यावर कोणत्याही प्रकारची प्रणाली सक्रिय नसून हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्यामुळे राज्यातील मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाची तीव्रता कमी झाली आहे. परिणामी राज्यात सुरू असलेल्या वादळी पावसाचा जोर कमी होणार आहे.
शनिवारी (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व पावसाची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या प्रणालीमुळे रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होत त्याची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात शुक्रवारी (ता. ५) सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूर येथे ३८.२ अंश सेल्सिअस तर महाबळेश्वर येथे १५.६ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदले गेले. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली होती.