![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मार्च २०२६ ।। पश्चिम आशियातील तणाव आणि एलपीजी टंचाईमुळे काही काळ अडचणीत आलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पॅन्ट्री कारमधील स्वयंपाकाची सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे १५ तासांहून अधिक प्रवास करणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवाशांना आता ताजे, गरमागरम अन्न मिळणार आहे. याआधी गॅसटंचाईमुळे फक्त आधीच तयार केलेले अन्न गरम करून देण्यात येत होते किंवा बाहेरील क्लाउड किचनवर अवलंबून राहावे लागत होते.
एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात पॅन्ट्री कारमधील स्वयंपाक बंद केला होता. त्या काळात इंडक्शन आणि मायक्रोवेव्हच्या सहाय्याने अन्न गरम करून देण्यात येत होते. मात्र, या व्यवस्थेबाबत प्रवाशांकडून अन्नाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी येत होत्या. आता गॅस पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्याने रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने सर्व केटरिंग परवानाधारकांना आवश्यक सूचना देत, सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
नवीन व्यवस्थेनुसार पॅन्ट्री कारमध्ये चहा, कॉफी, नाश्ता आणि राजमा-भातसारखे साधे पण ताजे अन्न बनवले जाणार आहे. एका ट्रेनमध्ये सरासरी १५० ते २०० प्रवासी जेवणाची मागणी करतात, त्यामुळे ही सुविधा प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईहून चेन्नई, हावडा, बंगळूरु आणि दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली असून, प्रवासादरम्यान ताज्या जेवणामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद होण्याची अपेक्षा आहे.
