महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मे । महाराष्ट्रासह देशभरात उकाड्यामुळे नागरीक आता हैराण होऊ लागले आहेत. मे महिन्याची सुरुवात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाने झाली होती. यामुळे मे महिना असूनही उन्हाळा जाणवत नव्हता. परंतु ८ मेपासून वातावरणात बदल झाला आहे. आता लोकांना उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. राज्यासह देशभरात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. आता पुणे वेधशाळेने राज्यातील काही भागांत heat wave, तर कुठे पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
काय आहे अंदाज
पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस उन्हाची तीव्रता वाढणार आहे. राज्यात 14 मे पर्यंत पुण्यात उष्णता वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे शहरातील तापमान 40°c पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचाही अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि गोव्यात हवामान कोरडे राहणार आहे.
जळगावात सर्वाधिक तापमान
राज्यात जळगावात सर्वाधिक तापमान होते. जळगावात ४१ अंश सेल्यियस तापमानाची नोंद झाली. पुणे आणि मुंबई शहरातील तापमानात वाढ झाली आहे. पुणे शहराचे तापमान ३४.८ तर मुंबईचे तापमान ३२.९ अंश सेल्सियस होते.