महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मे । महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल असणार आहे. याचे दूरगामी परिणाम भविष्यातील राजकारणावर पडणार आहे. या निकालानंतर घोडेबाजार करू नये, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी महाराष्ट्रातील राजकारण्यांना दिला.
शहरात सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यातील प्रत्येक व्यक्तीचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना ॲड. निकम म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कुणाच्याही बाजूने लागू शकतो. मात्र, या १५ आमदारांवर निकाल येईपर्यंत टांगती तलवार नक्कीच असेल, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य १५ आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर १४ फेब्रुवारी ते १६ मार्च सलग सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला आहे.