महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मे । महाविकास आघाडीकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एक बैठक देखील पार पडली. या बैठकीला शरद पवारांसह महाविकास आघाडीमधील सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून 48 जागांपैकी 20 जागांवर दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जागा वाटपावर प्रतिक्रिया
जागावाटपाबाबत अद्याप कोणताही फॉम्यूर्ला ठरलेला नाही. समान जागा वाटपाबाबतही काही ठरलेलं नाही. आम्ही 18 जागा लढवणार आहोत. आमचे 18 खासदार विजयी होतील. दादरा नगर हवेलीमधून देखील आमचा एक खासदार विजयी होईल. लोकसभेत आमचे 19 खासदार जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेनंतर सुरुवातील 20 जागांवर दावा करणारा शिवसेना ठाकरे गट दोन पऊलं मागं आला आहे का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.