महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुन । पावसाळा हा अनेकांच्याच आवडीचा ऋतू. कारण, या ऋतूमध्ये निसर्ग विविध ठिकाणांवर मुक्त हस्तानं उधळण केल्यामुळं त्यांचं सौंदर्य आणखीन खुलून आलेलं असतं. हा तोच ऋतू आहे ज्यामध्ये आपल्याला पावसाचा मनसोक्त आनंद घेता येतो. बेभान होऊन हिंडताही येतं. धबधब्यांच्या प्रवाहांना डोळे भरून पाहता येतं, तर खळाळणाऱ्या जलस्त्रोतांच्या किनारी बसून त्या थंडगार पाण्यात पाय भिजवत निवांत क्षणांचा आनंद लुटता येतो.
Monsoon म्हटलं की, त्याच्या आगमनापूर्वीच अनेक मंडळी मान्सून सहलींचे बेत आखू लागतात. सुट्ट्यांची आणि मित्रमंडळींची जमवाजमन करत मग एखाद्या सुरेख अशा ठिकाणाची निवड केली जाते आणि मग प्रतीक्षा सुरु होते ती म्हणजे तो दिवस उजाडण्याची. बरं, वीकेंडला घरात न बसता पावसाचा आनंद लुटण्यासाठी कुठंतरी छानशा ठिकाणी जाणारेही यात आलेच. पण, आता मात्र या सर्वांचाच हिरमोड होणार आहे.
आठवडी सुट्ट्यांच्या दिवशी म्हणजेच वीकेंडच्या दिवशी तुम्हीही कुठे जाण्याचा बेत आखताय का? आधी ही बातमी वाचा, कारण तुम्हाला हा बेत रद्द करावा लागू शकतो किंवा त्यात मोठे बदल करावे लागू शकतात. कारण ठरतोय एक शासन निर्णय.
पावसाळी सहलींसाठी तुम्हीही रागयगमधील कोणत्या ठिकाणी जाणार असालस, तर ही माहिती वाचा आणि इतरांनाही सांगा कारण, रायगडच्या माणगाव मधील पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. अनेकांचीच पसंती असणाऱ्या ताम्हिणी घाट, देवकुंड धबधबा, आणि सिक्रेट पॉइंट या ठिकाणी पर्यटकांना जाता येणार नाहीये.
माणगावचे प्रांताधिकारी उमेश बिरारी यांनीच त्यासंदर्भातील आदेश जारी केले असून, हे आदेश 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत लागू राहणार आहेत. मागील काही वर्षात या भागांत झालेल्या दुर्घटना पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय या परिसरात कलम 144 ही लागू करण्यात आलं आहे. त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात या ठिकाणांवर चुकूनही जाऊ नका.
का आली ही वेळ?
आतापर्यंत बऱ्याच पर्यटनस्थळांवर पर्यटकांकडून यंत्रणांमार्फत लागू करण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. अतिउत्साहाच्या भरात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अशाच नियमांचं उल्लंघन होऊन काहींना जीवही गमवावा लागला आहे त्यामुळं नाईलाजानं प्रशासनाला कठोर होत या निर्णयांची अंमलबजावणी करावी लागत आहे. आता राहिला प्रश्न याला जबाबदार कोण? तुम्हीच विचार करा.