एकाच देशात दोन कायदे कसे? समान नागरी कायद्याचे पंतप्रधानांकडून जोरदार समर्थन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । ‘एकाच कुटुंबातील सदस्यांना वेगवेगळे नियम लागू होत नाहीत मग, दोन वेगवेगळय़ा कायद्यांनुसार देश कसा चालेल,’ असा प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे स्पष्ट शब्दांत समर्थन केले. लोकसभा निवडणुकीच्या वर्षभर आधी भाजपच्या प्रचाराची दिशा स्पष्ट करतानाच, पंतप्रधानांनी मुस्लीम मतदारांना साद घातली आणि विरोधी पक्षांवर टीकेचे प्रहार केले.

भोपाळमधील ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमात १० लाख भाजप कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपचा अजेंडा उलगडून दाखवला. समान नागरी संहितेची अंमलबजावणी हा अनेक वर्षांपासून भाजपच्या निवडणूक प्रचारातील महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे. मात्र, आता यादृष्टीने केंद्र सरकार पावले उचलत आहे. विधि आयोगाने समान नागरी संहितेचे मूल्यमापन करण्यासाठी धार्मिक संघटनांकडून मते मागवण्यासाठी केलेले आवाहन याचेच निदर्शक मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयामध्ये यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत. अशातच मंगळवारी मोदी यांनी या कायद्याबद्दल आग्रही मांडणी केली. ‘संविधानामध्ये नागरिकांच्या समान हक्कांना समाविष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हा कायदा लागू करण्यास वारंवार सांगितले आहे. तरीही काही राजकीय पक्ष समान नागरी कायद्याविरोधात मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पक्ष मुस्लिमांचा अनुनय करतात पण, त्यांना खरोखर मुस्लिमांची काळजी असती तर, मुस्लीम शिक्षणामध्ये, रोजगारामध्ये मागे राहिले नसते’, अशी परखड टीका मोदींनी केली.

मोदींनी पसमंदा मुस्लीम आणि तिहेरी तलाक बंदी कायद्याचा भाषणात आवर्जून उल्लेख केला. मुस्लिमांमधील पसमंदा व महिला भाजपच्संया भाव्य मतदार असल्याचे सुचित करत, दोन्ही घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती द्या, त्यातून मुस्लिमांचा भाजपबद्दल असणारे गैरसमज दूर होतील, असा संदेश मोदींनी देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला. केंद्र सरकारने तिहेरी तलाक बंदी कायदा लागू केल्याचा लाभ भाजपला उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मिळाल्यामुळे मोदींनी पुन्हा भाजप कार्यकर्त्यांना हा मुद्दा लोकांपर्यंत घेऊन जाण्याची सूचना केली. तीन तलाकला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनी मुस्लीम मुलींवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावरही मोठा अन्याय केला आहे. तीन तलाकच्या भीतीखाली मुस्लीम महिलांना जगावे लागते, असे सांगताना अनेक मुस्लीमबहुल देशांत ही रीत नसल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. आजवर अनेक पक्षांनी तुष्टीकरणाचे धोरण राबवले. याचा देशावर विपरीत परिणाम झाला आहे. तुष्टीकरणाच्या धोरणामुळे उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिण भारत विशेषत: केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू अशा राज्यांत अनेक जातींचे नागरिक विकासापासून वंचित राहिले असल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला.

विरोधी पक्षांच्या एकीवर हल्लाबोल

पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक म्हणजे ‘छायाचित्रासाठीची दिखाऊगिरी’ असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. ‘हे विरोधी पक्ष म्हणजे भ्रष्टाचाराची हमी असून एकत्रितपणे हे सगळे २० लाख कोटींच्या घोटाळय़ातील आरोपी आहेत,’ असे मोदी म्हणाले. – पान ४

मोदी म्हणाले..

’पसमंदा मुस्लिमांचे जगणेही मुश्कील झाले आहे. त्यांच्या धर्मातील एका वर्गानेच पसमंदा मुस्लिमांचे इतके शोषण केले आहे, की त्यांना आजही समान वागणूक दिली जात नाही. त्यांना अस्पृश्य मानले जाते. या गरीब-मागास पसमंदापर्यंत भाजप विकास पोहोचवत आहे. त्यांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळत आहे.

’संविधानात नागरिकांच्या समान हक्कांना समाविष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हा कायदा लागू करण्यास वारंवार सांगितले आहे. तरीही काही राजकीय पक्ष समान नागरी कायद्याविरोधात मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *