महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ जुलै । यंदा अधिक मासामुळे गणपती बाप्पांचे आगमन 19 दिवस उशिराने होणार आहे. गतवर्षी गणपती बाप्पांचे आगमन 31 ऑगस्टला झाले होते. यावर्षी बाप्पा घरोघरी 19 सप्टेंबरला विराजमान होणार आहेत. तर अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर रोजी आहे.
यंदा मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. तरीही कुंभारवाड्यातील मूतिर्र्कार जोमाने कामाला लागले असून लाखो मूर्ती तयार करण्यात दिवस-रात्र व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळते. मागील वर्षी 31 ऑगस्ट 2022 ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. तर 9 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला होता. मात्र यंदा 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.
यावर्षी गणरायाचा मुक्काम 10 दिवसांचा असणार आहे. गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अजून 64 दिवस बाकी आहेत. मूर्तिकारांनी मार्च महिन्यापासूनच मूर्ती घडविण्याची लगबग सुरू केली आहे. जसजसे दिवस जात आहे, तसतसे मूर्ती बनविण्याचा वेग वाढत आहे. सध्या मूर्ती बनविणे व त्याचे फिनिशिंग करणे सुरू आहे. 50 दिवसांनंतर रंगरंगोटीचे काम सुरू होईल.