महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । पुणे शहर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच पुण्यातील वाहनांची संख्या देखील वाढली आहे. पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बसचा वापर करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. यावेळी गडकरी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच कचरामुक्त पुणे करण्यासाठी उपाय सुचवले आहेत. पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, असे देखील गडकरी यावेळी म्हणाले .
पुणेकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, म्हणजे वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होणार आहे. कारण चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं लोकार्पण आज झालंय. केंद्रीय मंत्री नितीत गडकरींच्या हस्ते चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं मोठ्या दिमाखात लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते
नितीन गडकरी म्हणाले, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की एकदा याचे एकदा प्रेझेंटेशन पहावे. हवेतून चालणारी बस ही पुण्यातील वाहतूक कोंडीवर हा चांगला पर्याय आहे. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्यासाठी हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून या बसमधून एका वेळेस 250 प्रवाशांन प्रवास करता येणार आहे.