पुण्यातील 15 किल्ल्यांवर लष्कराचे जवान फडकावणार ध्वज; राज्यातील ‘या’ गडकिल्ल्यांचाही समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ ऑगस्ट । यंदाच्या स्वातंत्र्यदिनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सैन्य दलाच्या सदर्न कमांडने देशातील 75 किल्ल्यांवर तिरंगा ध्वज फडकावण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील रोहिडा, हडसार, जीवधन, चावंडगड, शिवनेरी, भोरगिरी, पुरंदर, तोरणा, राजगड, विसापूर, लोहगड, सिंहगड, तिकोना, कोरीगड, तुंग. या गडकिल्ल्यांवर जवानांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड, रांगणा किल्ला, सामानगड, महिपतगड, पन्हाळा या गडकिल्ल्यांचा समावेश आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्याच्या रायगड किल्ल्यासह राज्यातील 49 किल्ल्यांचा समावेश आहे. ही माहिती लष्कराच्या सदर्न कमांड अ‍ॅडव्हेंचर सेलचे अधिकारी ए. ए. भाटे यांनी दिली.

किल्ले रायगडसह रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळील प्रबळगड, ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील माहुली, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड, रांगणा किल्ला, सामानगड, महिपतगड, पन्हाळा; सातारा जिल्ह्यातील पांडवगड, वैराटगड, चंदनगड, वंदनगड; संभाजीनगरमधील दौलतगड, अंतूर नाशिकमधील हातगड, मार्कंडे, रावळा, जावळा, धोडप, रामशेज, राजदेहेर, चांदवड, हरीहर, ब्रह्मगिरी, गेहेगड, बाहुला; अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर, बीतांगड, कलाडगड, भैरवगड, रतनगड, विश्रामगड, हरिश्चंद्रगड या राज्यातील 49 गडकिल्ल्यांचा समावेश आहे.

इतिहासाला मिळणार नवा उजाळा
सदर्न कमांडच्या या विशेष मोहिमेत महाराष्ट्राच्या पश्चिम विभागातील काही गिर्यारोहक स्वयंसेवक 15 ऑगस्ट रोजी सकाळी सैन्य दलासोबत मदतीसाठी जाणार आहेत. भारतीय लष्कराच्या या मोहिमेच्या निमित्ताने राज्यातील गडकिल्ल्यांच्या इतिहासाला नव्याने उजाळा मिळणार आहे. गिरीप्रेमी व शिवप्रेमींमध्ये या निमित्ताने आदराची भावना निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *