महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० ऑगस्ट । मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत होते. हे अपघात टाळण्यासाठी परिवहन विभागाकडून मोठी योजना हाती घेतली गेली होती. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहे. या योजनेनुसार परिवहन विभागाकडून वेगवेगळ्या स्तरावर काम केले गेले. यामुळे गेल्या सहा महिन्यांत अपघातांचे प्रमाण २० टक्के कमी झाले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सलग २४ तास परिवहन विभागाने पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर कारवाई केली. त्यामुळे अपघात मृत्यू होण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत घटले आहे.
पुणे मुंबई महामार्गावर वाढलेल्या अपघातांमुळे आरटीओच्या वायुवेग पथकाने २४ तास कारवाई सुरु केली. गेल्या सहा महिन्यात नियम मोडणाऱ्या अनेक वाहनचालकांना दंड केला आहे. त्यात वाहन चालवताना लेन कटिंग मोडणे, निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहने चालवले, सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर कारवाई झाली. दहा हजारपेक्षा जास्त वाहनधारकांनी वेगाचा नियम मोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली. आणि वेगाबद्दल चालकांचे होणारे समुपदेशन अशा विविध कारणांमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांचे प्रमाण घटलेले पाहायला मिळाले.
पुणे मुंबई महामार्गावर आता इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) उभारण्याचे काम सुरु आहे. यामुळे स्मार्ट पद्धतीने प्रत्येक वाहनधारकावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. MSRDC कडून या प्रणालीवर काम सुरु आहे. यामुळे आता महामार्गावर 430 कॅमेरे 24 तास वाहनधारकावर लक्ष ठेवणार आहे. हे कॅमेरे 17 प्रकारचे वाहतुकीचे उल्लंघन शोधण्यास सक्षम आहे.
या नियमांचे पालन सक्तीचे
ITMS प्रमाणी २४ तास लक्ष ठेवणार आहे. यामुळे महामार्गावर केलेले नियम वाहनधाराकांना पाळावे लागणार आहे. म्हणजे एक्स्प्रेस वेवरील तीन लेनपैकी डावीकडून जाणारी पहिली लेन अवजड वाहनांसाठी असणार आहे. दुसरी लेन चारचाकींसाठी असेल. तर तिसरी लेन ओव्हरटेकची असणार आहे.