महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुन ।। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आज २५ वर्ष पुर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे १० जून १९९९ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही पक्षाचा वर्धापनदिन धुमधडाक्यात साजरा होणार आहे. मात्र अजित पवारांच्या बंडानंतर पक्ष अन् चिन्ह त्यांच्याकडे गेल्याने आणि दोन गट पडल्याने यंदा दोन वर्धापनदिन साजरे होणार आहेत.
शरद पवार गटाचा नगरमध्ये वर्धापनदिन..
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन अहमदनगरमध्ये साजरा होणार आहे. अहमदनगर शहरातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मैदानावर रौप्यमहोत्सवानिमित्त भव्य सभा पार पडणार आहे. या सभेला स्वतः शरद पवारांसह इतर नेते संबोधित करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने घवघवीत यश मिळवले. पक्ष, चिन्ह गेल्यानंतरही शरद पवार यांनी १० पैकी ८ खासदार निवडून आणण्याची किमया केली. या सर्व नवोदित खासदारांचा भव्य सत्कार यावेळी होणार आहे. तसेच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज काय बोलणार? पक्ष संघटनेत बदल करुन भाकरी फिरवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
अजित पवार गटाचा मुंबईत मेळावा
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरा केला जाणार आहे. सायन येथील क्षमुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाची अजित पवार गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांमधील मोठ्या पराभवानंतर वर्धापन दिन होत असताना अजित पवार काय बोलणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.