महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ ऑगस्ट ।। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने मोर्चेबांधणी सुरू केली असून राज ठाकरे हे स्वतः महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील ओबीसी- मराठा आरक्षणाच्या संघर्षावरुन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे महत्वाचे विधान केले.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज्यात सध्या सुरू असलेल्या ओबीसी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत राज्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. “राज्यात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. मराठा ओबीसी वाद हे मताचे राजकारण आहे. लहान लहान मुळे आरक्षणामुळे आमची मैत्री तुटली असं सांगतात, हे चित्र भीषण आहे, महाराष्ट्रात असे चित्र कधीच नव्हते,” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
शरद पवारांवर टीका
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती होण्याची भिती व्यक्त केली होती. यावरुनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात हातभार लावू नये, महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये म्हणून काळजी घ्यावी असा टोला त्यांनी लगावला.
“आपला सर्वाधिक पैसा हा बाहेरच्या लोकांवर खर्च होतोय. ठाणे जिल्हा हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे 7-8 महापालिका आहेत. मग इथली लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? ही लोकसंख्या बाहेरच्या लोकांनी वाढवली. आपला पैसा त्यांची व्यवस्था करण्यातच जातो, आपल्या नोकऱ्याच्या जाहिराती युपी बिहारमध्ये येतात, मग आपल्या तरुणांना हे कळत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.