महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० ऑगस्ट ।। राज्याच्या विधानसभेची निवडणूक गतवर्षी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी झाली, पण २६ नोव्हेंबरला विधानसभा अस्तित्वात आली. त्यामुळे राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठी २६ नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणूक घेणे आवश्यक आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू झाल्यास दिवाळीनंतर (३ नोव्हेंबरनंतर) २६ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक घेता येवू शकते, असा अंदाज निवडणूक विभागातील विश्वसनिय सूत्रांनी वर्तविला आहे.
२०१९मध्ये महाराष्ट्राबरोबर हरियाणाचेही मतदान २१ ऑक्टोबर रोजी पार पडले होते. पण, २०२४ मध्ये हरियाणा विधानसभेसाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी होणार, आचारसंहिता कधीपासून लागू होणार, याचा अंदाज सर्वच राजकीय पक्षांकडून घेतला जात आहे. महाविकास आघाडी सरकारला पाडून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला ३० जून २०२४ रोजी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पण, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकार राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी विविध योजनांमधून गावोगावी पोचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीवर कोट्यवधींचा खर्च केला जात असून ५० हजार योजना दूत नेमून त्यांच्या माध्यमातूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, अशा योजनांचा प्रचार-प्रसार केला जात आहे. निवडणूक महिनाभर लांबल्यास त्या सर्व योजनांच्या प्रचाराला पुरेसा वेळ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात विधानसभेची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये जाहीर होऊन दिवाळीनंतर मतदान होवू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.