’50 किमी अंतरावर घर, मग 15 मिनिटांत घटनास्थळी कसा पोहोचला ठाकरेंचा आमदार?’ या पोस्टनं खळबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० ऑगस्ट ।। कोकणातील मालवण भागामध्ये असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेलाय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला आणि येकच खळबळ माजली. पुताळ कोसळण्याच्या घटनेनंतर संपूर्ण देशाचं लक्ष वेधणाऱ्या राजकोट किल्ल्याकडे नेतेमंडळींचे पाय वळले आणि त्यातूनच टोकाचा संघर्षही डोकं वर काढताना दिसला.

संघर्ष विकोपाला गेला असतानाच ही ठिणगी अद्याप धुमसत असल्याची स्थिती कायम आहे. त्यातच आता राजकीय आरोप प्रत्योरापंना सुरुवात झाली असून, सत्ताधाऱ्यांनी आता याच ठिकाणी शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या उभारणीसाठीच्या कामाला वेग दिला आहे. राजकोटमधील शिवरायांच्या पुतळ्याविषयीची महत्त्वाची माहिती दर दिवशी समोर येत असतानाच आता निलेश राणे यांनी X च्या माध्यमातून एक पोस्ट करत ठाकरे पक्षाच्या एका आमदाराचं नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले आणि नव्या राजकीय वादानं डोकं वर काढलं.

निलेश राणेंनी पोस्टमध्ये म्हटलं…
‘आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो???
जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.’

वैभव नाईक यांचं नाव घेत निलेश राणे यांनी केलेली ही पोस्ट पाहता आता यावर ठाकरे पक्ष आणि खुद्द नाईक काय प्रतिक्रिया देणार यावर सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान, राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आपली पोलीस आणि गृखात्याकडून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया नाईकांनी दिली होती. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत दडपशाहीचं राजकारण सुरूच राहील असं सांगताना त्यांनी पुतळा उभारणी आणि अनावरण सोहळ्यादरम्यानच्या काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप केले होते.

दरम्यान एकिकडे राजकीय हेवेदावे सुरू असतानाच दुसरीकडे सदर प्रकरणी कारवाईला वेग आला असून, शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असणाऱ्या स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गुरुवारी मध्यरात्री ही अटकेची कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *