![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ सप्टेंबर ।। परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. परतीच्या पावसाने पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील चारही प्रमुख धरणं भरली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीमुळे या धरणांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
किती टक्के भरली धरणं
पुणे शहराजवळील खडकवासला धरण 90.39 टक्के, पानशेत, वसरगाव आणि टेमघर ही धरणे 100 टक्के एवढ्या क्षमतेने भरलेले आहे. पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेले पावना धरण 10 टक्के भरले आहे. हवामान खात्याने हा संपूर्ण आठवडा मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे सोबतच दक्ष राहण्यास सांगितले आहे.
#पुणे जिल्ह्यात २४ ते २९ सप्टेंबर २०२४ याकाळात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुणे व #पिंपरीचिंचवड शहराजवळील धरणातून आवश्यकतेनुसार विसर्ग करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.#pune pic.twitter.com/dUbdCxIIOc
— PMC Care (@pmccarepune) September 24, 2024
पुणे महानगरपालिकेचा सतर्कतेचा इशारा
अतिवृष्टीचा इशारा 24 ते 29 सप्टेंबर 2024 या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुळा व पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. तसंच त्यानंतर पर्जन्यमानानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्यात येईल, असं देखील सांगण्यात आलं आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी पवना नदीपात्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सखल भागातील संबंधीत नागरीकांनी नदीपात्रात न उतरण्याचा सल्ला दिला आहे.
