महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ ऑक्टोबर ।। महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्या म्हणजेच मंगळवारी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वी आज (सोमवार) राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये अनेक लक्षवेधी निर्णय होऊ शकतात. विद्यमान राज्य सरकारची ही शेवटची बैठक असेल.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे १३ ऑक्टोबर रोजी रविवारच्या सुटीच्या दिवशीही सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय प्रसिद्ध केले असून सोमवारी सकाळीच मंत्रिमंडळ बैठकही आयोजित केली आहे. आचारसंहिता लागू होण्याचीच ही चाहूल असल्याचे मानले जात आहे.
राज्यातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार, सोमवारी राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. सोमवार अथवा मंगळवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होऊन निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मिळालेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान तर, २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान मतमोजणी होऊ शकते. २६ नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. त्यामुळे या आठवड्यात कोणत्याही क्षणी राज्यातील निवडणुकीची घोषणा होऊ शकते.
मंत्रिमंडळाची बैठक
मंत्री गिरीश महाजन यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ही शेवटची बैठक असल्याचे जाहीर केले होते. मात्र सोमवारी (ता. १४) सकाळी साडेनऊ वाजता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर कधीही आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.