महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ नोव्हेंबर ।। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळवत महायुतीने 232 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या ऐतिहासिक विजयाला 72 तास उलटून गेल्यानंतरही मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचं उत्तर राज्याच्या जनतेला मिळालेलं नाही. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने एकनाथ शिंदेंना विधानसभा बरखास्त करण्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याने लवकरात लवकर नवा मुख्यमंत्री कोण याची निवड करावी लागणार आहे. असं असतानाच आता मुख्यमंत्रिपदासंदर्भात कोण निर्णय घेणार याबद्दलची माहिती समोर आली आहे. 
‘ही’ व्यक्ती ठरवणार मुख्यमंत्री कोण
महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न आता विचारला जात आहे. महायुतीचा विजय होऊन 72 तास उलटले तरीही राज्यात नवा मुख्यमंत्री आणि नव्या सरकारचा शपथविधी अद्यापही पार पडलेला नाही. भाजपा आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या विधानावरून दिसून येतंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय अंतिमतः भाजपाचे नेते तसेच गृहमंत्री अमित शहा घेणार असल्याचं कळतंय. दरम्यान, काल देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. मात्र त्यांची भाजप श्रेष्ठींश बैठक झाली की नाही याबद्दल अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र या पार्श्वभूमीवर त्यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय. आज रात्रीपर्यंत यावर निर्णय होऊन उद्या सकाळपर्यंत नाव घोषित होईल अशीही एक शक्यता व्यक्त केली जात आहे.